महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जून ।। अनेकदा आपण म्हणतो वेळ निघून गेली की हातून संधी देखील निसटून जाते. आयुष्य पुन्हा संधी देत नाही. पण तसं नाही. आयुष्य आपल्याला एक संधी कधीतरी पुन्हा देतेच. हे उदाहरण सांगण्यामागचं कारणं म्हणजे सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय आहे. हा निर्णय जास्त गुणांसाठी धडपडणाऱ्या आणि परीक्षेची पुन्हा संधी मिळावी अशी आशा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फार फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. कारण तसा निर्णयच घेण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात CBSE ने दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 2026 पासून लागू होईल. याचाच अर्थ पुढच्या वर्षी सीबीएसई बोर्डाकडून दहावी बोर्डाच्या दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर सीबीएसईने दहावी बोर्डाची दोन वेळा परीक्षा घेण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या दहावी बोर्डाची पहिली परीक्षा ही फेब्रुवारीमध्ये होईल. तर दुसरी परीक्षा ही मे महिन्यात आयोजित केली जाईल. फेब्रुवारीत होणारी पहिली परीक्षा आणि मे महिन्यांत होणारी दुसरी परीक्षा या दोन्ही परीक्षांचे निकाल जून महिन्यात जाहीर केले जातील, अशी माहिती समोर येत आहे.
सीबीएसईच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या बोर्डाच्या परीक्षेला बसणं अनिवार्य असेल. ही परीक्षा दिल्यानंतर मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थी आपल्या इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. दुसऱ्या परीक्षेत विद्यार्थी आपल्या गुणांमध्ये सुधारणा करण्यासाठी भाग घेऊ शकतात. नव्या नियमांनुसार इंटर्नल असेसमेंट वर्षात केवळ एकदाच केले जातील. तसेच दोन्ही परीक्षांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या परीक्षेत जास्त गुण मिळाले आहेत ते गुण फायनल मानले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.
परीक्षेबद्दल महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे:
सीबीएसई दहावी बोर्डाची पहिली परीक्षा ही 17 फेब्रुवारी ते 6 मार्च या काळात आयोजित केली जाऊ शकते. तर दुसरी परीक्षा ही 5 मे ते 20 मे या काळात आयोजित केली जाऊ शकते. अर्थात परिस्थितीनुसार कदाचित वेळापत्रकात थोडाफार बदलही होऊ शकतो