Devendra Fadanvis : “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा! : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०५ ऑगस्ट ।। मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत मुंबईच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. “मुंबई घडवण्यात उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिकांचं मोठं योगदान आहे,” असं वक्तव्य करीत त्यांनी मराठी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. यावरुनच आता त्यांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशिकांत दुबे यांना महत्त्वाचा सल्ला दिला.

आता पुन्हा एकदा निशिकांत दुबेंनी मराठी भाषिकांना डिवचण्याचे काम केलं. उत्तर प्रदेश, बिहारी आणि हिंदी भाषिकांचं मुंबई बनवण्यात मोठे योगदान आहे. मुंबईतील लोकसंख्येत केवळ ३० टक्के मराठी भाषिक असल्याचं निशिकांत दुबे यांनी म्हटलं. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबेंच्या या विधानावर भाष्य केलं. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले.

‘इथले मराठी आणि अमराठी सुरक्षित’
“निशिकांत दुबेंनी अशा प्रकारची वक्तव्ये करु नयेत. इथली परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. इथले मराठी आणि अमराठी सुरक्षित आहेत. सगळे एकमेकांसोबत योग्य प्रकारे नांदत आहेत. महाराष्ट्रामध्ये कुठलाही मराठी आणि गैरमराठी असा कुठलाही वाद नाही. काही लोक जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना मराठी आणि अमराठी लोकं निवडणुकीत त्यांची जागा दाखवतील. त्यामुळे माझा सल्ला निशिकांत दुबेंना असा असेल की त्यांनी या विषयमध्ये कोणतही वक्तव्य करु नये,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले निशिकांत दुबे?
“मुंबई बनवण्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिकांचे मोठे योगदान आहे. आजही जी अर्थव्यवस्था आहे त्यात आम्हीही योगदान देत आहोत. केवळ आम्हीच करतोय असं मी बोलत नाही. तुम्ही कोणत्या आधारे बोलता, केवळ ३० टक्के लोक मुंबईत मराठी बोलतात. १२ टक्के लोक उर्दू बोलतात. जवळपास ३० टक्केच हिंदी भाषिक आहेत. २ ते अडीच टक्के राजस्थानी बोलतात, कुणी गुजराती बोलतात, भोजपुरी बोलतात. त्यामुळे भाषेच्या आधारावर त्यांचा हेतू साध्य होणार नाही. निवडणुकीसाठी भाषेचे राजकारण केले जाते मात्र यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णत: मुंबईतून संपून जाईल,” असं निशिकांत दुबे यांनी एका मुलाखतीमध्ये म्हंटल होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *