महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट ।। गणेशोत्सवासाठी अवघे १०-१२ दिवस उरले आहेत. गणेशोत्सवात चाकरमानी कोकणात जातात. दरम्यान, तुम्हीही कोकणात जाणार असाल तर बातमी खास तुमच्यासाठी. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि विनाअडथळा व्हवा यासाठी रायगड जिल्हा प्रशासन उपाययोजना करणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूकीत बदल (Mumbai-Goa Highway Traffic Rule Change)
महामार्गावर वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 29 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असणार आहे. त्यानंतर 2 ते 4 सप्टेंबर आणि 6 ते 8 सप्टेंबर या कालावधीत देखील महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी असणार आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
याचसोबत मुंबई-गोवा महामार्गावर पोलीस मदत केन्द्र, टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल. वैद्यकीय कक्ष, रूग्णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकिय उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
चाकरमान्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. हजारो चाकरमानी दरवर्षी गणपतीत गावी जातात. परिणामी महामार्गावर खूप गर्दी होते. अशातच जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. त्यात एखादे मोठे वाहन बंद झाले तर तासनतास एकाच जागेवर थांबावे लागते. त्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.