![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात सुट्टी आली की माणसं दोन ठिकाणी हमखास जातात—देवदर्शनाला किंवा थेट महाबळेश्वरला! यंदा ख्रिसमस, शनिवार आणि रविवार असा सुट्टीचा त्रिकूट योग जुळून आला आणि पर्यटकांनी पाचगणी-महाबळेश्वरवर अक्षरशः चाल करून टाकली. परिणामी निसर्गरम्य डोंगररांगा दिसायच्या आधीच वाहनांच्या रांगा दिसू लागल्या—त्या पण ४ ते ६ किलोमीटर लांब!
पसरणी घाटात सकाळपासूनच गाड्यांची सर्पिल पूजा सुरू झाली. गाडी पुढे जातेय की आपणच मागे जातोय, असा संभ्रम चालकांना पडला. काहींचं निसर्गदर्शन कारच्या काचेतूनच झालं, तर काहींची सहल थेट क्लच-ब्रेक-अॅक्सेलरेटर या त्रिमूर्तीपुरतीच मर्यादित राहिली.
पाचगणीचा दांडेघर नाका आणि महाबळेश्वरचा वेण्णा लेक परिसर म्हणजे मानवी मेळा. पाय ठेवायला जागा नाही, फोटो काढायला वेळ नाही आणि चहा मिळेल की नाही याची शाश्वती नाही! निसर्ग पाहायला आलेले पर्यटक शेवटी एकमेकांकडेच पाहत उभे.
यात भर म्हणजे काही अतिउत्साही पर्यटकांची हुल्लडबाजी. ओव्हरटेकिंग, मध्येच गाडी पार्क करणे, नियम म्हणजे फक्त सूचनाफलक—असा काहींचा ठाम समज. शिस्त पाळणाऱ्यांना याचा त्रास, आणि वाहतूक कोंडीत अजून भर. म्हणायला पर्यटन, पण वागायला रस्त्याचा उत्सव.
या गर्दीत अडकल्या त्या शालेय सहली! सुट्टीचा मुहूर्त साधून आलेल्या शाळांच्या बस घाटातच थांबल्या. लहान मुलं, पाण्याची अडचण, खाण्यापिण्याची कुचंबणा—शैक्षणिक सहल थेट संयम प्रशिक्षण शिबिर बनली. शिक्षकांपेक्षा मुलांनीच जास्त धडे घेतले—“सुट्टी म्हणजे हमखास मजा नसते!”
दुसरीकडे पोलिस, होमगार्ड्स थंडी-उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर उभे. पण वाहनांचा लोंढा इतका की नियोजनही थकून जावं. “संयम ठेवा, नियम पाळा,” असं आवाहन होतंय; पण सुट्टीच्या उत्साहात ते ऐकायला कुणाकडे वेळ?
एका पर्यटकाचं वाक्य सारं सांगून जातं—
“निसर्ग पाहायला आलो होतो, पण अर्धा दिवस गाडीच्या नंबर प्लेटच पाहत बसलो!”
एकूण काय, पाचगणी-महाबळेश्वर हाऊसफुल्ल झाले, हे खरं; पण प्रश्न असा आहे—हाऊसफुल्ल निसर्गाचा की वाहनांचा?
सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल, तर पुढच्या वेळी एकच मंत्र लक्षात ठेवा—
निसर्ग शांत आहे, पण आपण नाही—आणि कोंडी तिथूनच सुरू होते!
