![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दिनांक २५ फेब्रुवारी २०२६।।पुणे शहराची ओळख कधीकाळी शिक्षणनगरी, संस्कृतीनगरी अशी अभिमानाने सांगितली जायची; पण सध्या त्या ओळखीवर धुळीची जाड चादर पसरली आहे. रस्त्यांवरून धावणाऱ्या मिक्सर, टिप्पर, डंपर आणि सिमेंटच्या गाड्यांनी अक्षरशः धुरांचे ढग उडवले आहेत. बांधकामांच्या ठिकाणी उभारलेले आरएमसी प्लांट हे उद्योग कमी आणि धुळीचे कारखाने अधिक वाटू लागले आहेत. सकाळी घराबाहेर पडताना ताजी हवा मिळावी, ही अपेक्षा आता विनोद ठरू लागली आहे. धूर, सिमेंटची बारीक पूड आणि उडणारी माती यामुळे वातावरण कायम धूसर दिसते. विकासाच्या नावाखाली उभारले जाणारे प्रकल्प नागरिकांच्या फुफ्फुसांवरच उभारले जात आहेत का, असा प्रश्न आता सर्रास विचारला जातो आहे.
या धूळ-धुराच्या सततच्या माऱ्यामुळे अनेक पुणेकरांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. दमा, अॅलर्जी, सततचा खोकला, डोळ्यांची जळजळ या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे डॉक्टर सांगतात. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना तर घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. काही भागांत परिस्थिती अशी की, दिवसभर खिडक्या बंद ठेवून घरातच बसावे लागते. बाहेर वाळवलेले कपडे पुन्हा धुवावे लागतात, गॅलरीत ठेवलेली भांडी धुळीने माखलेली दिसतात. हवा शुद्ध करण्यासाठी एअर प्युरिफायरचा आधार घ्यावा लागतो, हीच शहराच्या ‘प्रगती’ची शोकांतिका म्हणावी लागेल. आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असताना संबंधित यंत्रणा मात्र कागदोपत्री कारवाईत गुंतल्याचे चित्र दिसते.
शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या गाड्यांचा वावर दिवसाढवळ्या सुरू असतो. मिक्सर, टिप्पर, डंपर राजरोसपणे धावतात; अनेकदा त्यांच्या चाकांमधून चिखल आणि सिमेंट रस्त्यावर सांडत राहते. नियम आहेत, पण अंमलबजावणीचा पत्ता नाही. झाकण न लावलेले ट्रक, वेगाने धावणारी अवजड वाहने आणि त्यातून उडणारी धूळ – हा रोजचा अनुभव झाला आहे. विकास हवा, पण तो नागरिकांच्या श्वासावर बोजा ठेवून नको, अशी भावना आता तीव्र होत आहे. पुणेकरांना स्वच्छ हवा हा चैनीचा नव्हे तर मूलभूत हक्क आहे. प्रशासनाने केवळ बैठका न घेता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई केली, तरच या धुळीच्या साम्राज्यावर नियंत्रण येईल; अन्यथा ‘स्मार्ट सिटी’च्या फलकामागे आजारी शहर दडलेलेच राहील.
