✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मार्च २०२६ ।। जग आधीच LPG आणि तेल संकटाच्या छायेत असताना आता आणखी एका अदृश्य पण भयानक संकटाची चाहूल लागली आहे—इंटरनेट! मध्य पूर्वेतील युद्धामुळे परिस्थिती इतकी ताणली गेली आहे की, जगाला जोडून ठेवणाऱ्या समुद्राखालील इंटरनेट केबल्सच धोक्यात आल्या आहेत. विशेषतः Strait of Hormuz या अरुंद सागरी मार्गात मोठ्या प्रमाणावर फायबर-ऑप्टिक केबल्स टाकण्यात आल्या आहेत. याच केबल्सवर जगातील इंटरनेट ट्रॅफिकचा मोठा भार असतो. जर या केबल्सना काही झाले, तर जग अक्षरशः ‘ऑफलाईन’ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या Iran आणि Israel यांच्यातील संघर्षामुळे या भागात तणाव शिगेला पोहोचला आहे. समुद्रात माइन्स टाकल्या गेल्याच्या बातम्या, जहाजांवर हल्ले आणि वाहतुकीत अडथळे—या सगळ्याचा परिणाम केवळ तेलपुरवठ्यावरच नाही, तर इंटरनेटवरही होऊ शकतो. Bab-el-Mandeb Strait परिसरातही अस्थिरता वाढली असून, हा दुसरा महत्त्वाचा मार्गही धोक्यात आला आहे. या दोन्ही सागरी मार्गांतून युरोप, आशिया आणि आफ्रिका यांना जोडणाऱ्या अनेक केबल्स जातात.
या केबल्स म्हणजे फक्त वायर नाहीत, तर जागतिक अर्थव्यवस्थेची ‘नाडी’ आहेत. AAE-1, FALCON, आणि Tata TGN-Gulf Cable System सारख्या प्रमुख नेटवर्क्स याच भागातून जातात. Google, Microsoft आणि Amazon यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे डेटा सेंटर्सही या केबल्सवर अवलंबून आहेत. त्यामुळे जर या केबल्स कापल्या गेल्या किंवा नुकसान झाले, तर बँकिंग, शेअर बाजार, विमानसेवा, ऑनलाइन सेवा—सगळंच ठप्प होऊ शकतं.
भारतासाठी ही परिस्थिती विशेष धोकादायक ठरू शकते. कारण भारतातील अनेक इंटरनेट डेटा मार्ग हे आखाती प्रदेशातूनच जातात. केबल्सना नुकसान झाल्यास इंटरनेटचा वेग कमी होणे, कॉल ड्रॉप्स, ऑनलाइन व्यवहारांमध्ये अडथळे—अशा समस्या निर्माण होऊ शकतात. आयटी उद्योग, स्टार्टअप्स, बँकिंग आणि डिजिटल पेमेंट्सवर याचा थेट परिणाम होईल.
थोडक्यात, हे संकट डोळ्यांना दिसत नाही, पण परिणाम मात्र प्रचंड मोठे असू शकतात. तेलानंतर आता इंटरनेटही ‘युद्धाच्या रडारवर’ आलं आहे. प्रश्न एकच—ही केबल्स सुरक्षित राहतील का, की जगाला डिजिटल अंधाराचा सामना करावा लागेल?
