![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल २०२६ ।। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची उत्सुकता अजून काही काळ कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी चर्चा सुरू असताना, केंद्र सरकारने याच्या अंमलबजावणीबाबतचा वास्तव चित्र समोर आणलं आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली असून, शिफारसी सादर करण्यासाठी तब्बल १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तात्काळ पगारवाढीची अपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थोडा संयम ठेवावा लागणार आहे.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयोग एप्रिल २०२७ पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र, हा अहवाल सादर झाला म्हणजे लगेचच पगारवाढ लागू होईल, असं नाही. या शिफारसींचा अभ्यास करून सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात पगारवाढ लागू होण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात. काही अंदाजानुसार, २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ मध्ये वेतनवाढ लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना केवळ पगारवाढच नाही, तर महागाई भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, अंमलबजावणीत झालेल्या विलंबामुळे एरियरचा लाभही मिळू शकतो. त्यामुळे सध्या थोडी प्रतीक्षा असली, तरी पुढील काळात मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची आशा कर्मचाऱ्यांना आहे.
