![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ एप्रिल २०२६ ।। महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आहे. कोल्हापूर, सावंतवाडी, रत्नागिरीसारख्या भागांना जोडणाऱ्या गाड्या बंद करून उत्तर भारताकडे धावणाऱ्या ‘गोरखपूर स्पेशल’ला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. ‘झिरो बेस्ड टाइमटेबल’च्या नावाखाली महाराष्ट्रातील गाड्यांचे रूटच बदलले गेले, काही पूर्णपणे बंद झाल्या, तर काहींचे टप्पे कमी करण्यात आले. परिणामी, रोजच्या प्रवासासाठी रेल्वेवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना अक्षरशः रस्त्यावर उतरावं लागणार आहे. या अन्यायाविरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने १ मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. “महाराष्ट्राला दुय्यम वागणूक का?” हा प्रश्न आता अधिक तीव्र झाला आहे.
रेल्वे प्रशासनाचा दावा आहे की, प्रवासी संख्या आणि संसाधनांचा योग्य वापर लक्षात घेऊन हे निर्णय घेतले गेले. मात्र, वास्तव वेगळंच चित्र दाखवतं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवासी आजही गर्दीने भरलेल्या गाड्यांमध्ये प्रवास करत आहेत. तरीही त्यांच्या सोयीच्या गाड्या बंद करून उत्तर भारतासाठी अतिरिक्त फेऱ्या वाढवल्या जात आहेत. मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस, पुणे-नाशिक-भुसावळ एक्सप्रेस, दादर-रत्नागिरी पॅसेंजर अशा २५ हून अधिक गाड्यांवर गंडांतर आलं आहे. दुसरीकडे दादर-गोरखपूरसारख्या गाड्यांना मात्र ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात आहे. प्रवाशांच्या मते, “हे नियोजन नाही, हा स्पष्ट दुजाभाव आहे.” रेल्वेच्या या धोरणामुळे कोकण, मराठवाडा आणि ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
या पार्श्वभूमीवर आता प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. केवळ मोर्चाच नाही, तर राज्यभरातून रेल्वे प्रश्नांवर एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दादर येथे राज्यस्तरीय रेल्वे परिषद घेण्याचाही निर्णय झाला आहे. “रेल्वे ही केवळ सुविधा नाही, तर जीवनवाहिनी आहे,” असा ठाम संदेश देत प्रवासी आता रस्त्यावर उतरायला सज्ज झाले आहेत. १ मे रोजी होणारा हा मोर्चा केवळ आंदोलन नसेल, तर तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज असेल—आणि हा आवाज दुर्लक्षित करणे रेल्वेसाठी सोपं नसेल!
