![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ एप्रिल २०२६ ।। जागतिक तणावाच्या धक्क्यांनी काही दिवसांपूर्वी थरथरलेला सराफा बाजार आता पुन्हा उजळून निघाला आहे. गेल्या महिनाभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर ग्राहकांनी पुन्हा खरेदीकडे मोर्चा वळवला आहे. लग्नसराईच्या हंगामात ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेणारे ग्राहक आता सराफा दुकानांकडे गर्दी करताना दिसत आहेत. सोन्याच्या दरात तब्बल २५ हजारांची घसरण, तर चांदीत ५२ हजारांची घसरण झाल्याने खरेदीसाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे महिनाभर सुस्तावलेला बाजार आता पुन्हा चैतन्याने भरून गेला आहे.
सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर दीड लाखांच्या आसपास स्थिरावला असून एक किलो चांदीचे दर सुमारे २ लाख ३८ हजारांवर पोहोचले आहेत. या स्थिरतेमुळे ग्राहकांचा विश्वास परत मिळताना दिसतोय. विशेषतः लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नवरीच्या दागिन्यांसाठी पारंपरिक डिझाईनपासून ते आधुनिक ज्वेलरीपर्यंत मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, “दरातील चढ-उतार थांबल्यामुळे ग्राहक निर्धास्तपणे खरेदी करत आहेत.” त्यामुळे आगामी काही दिवसांतही हीच तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आता काहीशी कमी होत असल्याने बाजारात स्थिरता दिसून येत आहे. याचाच फायदा ग्राहक घेत आहेत. “दर कधी वाढतील सांगता येत नाही,” या भीतीने आधी खरेदी टाळणारे लोक आता ‘हीच योग्य वेळ’ मानून पुढे येत आहेत. एकीकडे गुंतवणूक म्हणून आणि दुसरीकडे लग्नसराईच्या निमित्ताने—सोनं-चांदी पुन्हा एकदा ग्राहकांच्या पसंतीचं केंद्रबिंदू ठरत आहे. सराफा बाजारात आलेलं हे नवचैतन्य टिकून राहणार का, हे आता पुढील काही दिवस ठरवतील!
