![]()
पुणे महापालिकेची भूसंपादन मोहीम वेगात; ८४ मिळकती ताब्यात, आयुक्त नवलकिशोर राम यांच्या पाठपुराव्याला यश
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मे २०२६ ।। पुणेकरांच्या संयमाची रोज परीक्षा घेणाऱ्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या वाहतूक कोंडीवर अखेर महापालिकेने हालचाल सुरू केली आहे. वर्षानुवर्षे फाइलांच्या ढिगाऱ्यात अडकून पडलेले रस्ता रुंदीकरणाचे काम आता प्रत्यक्षात सरकू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुणे महापालिकेकडून कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण मोहिमेला वेग देण्यात आला असून मागील अवघ्या एका महिन्यात तब्बल ८४ मिळकती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. उर्वरित २५ मिळकतीही लवकरच ताब्यात घेतल्या जाणार असल्याने या रखडलेल्या प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा मानला जाणारा भूसंपादनाचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आला आहे.
महापालिकेने २०१७ मध्ये कात्रज ते कोंढवा खडी मशीन चौक या साडेतीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. सुरुवातीला तब्बल ८४ मीटर रुंदीच्या रस्त्याची योजना आखण्यात आली आणि निविदाही काढण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात जागाच उपलब्ध नसल्याने हा प्रकल्प पहिल्याच टप्प्यात अडकला. दरम्यान, वाहतूक कोंडीने विक्राळ रूप धारण केले. रोज सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या अंतहीन रांगा, हॉर्नचा कर्णकर्कश आवाज आणि धुराच्या ढगांत अडकलेले नागरिक यामुळे हा रस्ता पुणेकरांच्या डोकेदुखीचा विषय बनला होता. “रस्ता कमी आणि पार्किंग जास्त,” अशी उपरोधिक टीका नागरिकांकडून होत होती.
अखेर प्रशासनाने वास्तव स्वीकारत पहिल्या टप्प्यात ८४ मीटरऐवजी ५० मीटर रुंदीकरणाचा निर्णय घेतला. छोट्या जागामालकांना टीडीआर आणि एफएसआय देताना निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी, तसेच अनेक मालकांकडून रोख मोबदल्याची मागणी यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया गुंतागुंतीची बनली होती. त्यामुळे महापालिकेने थेट मोबदला देत जागा ताब्यात घेण्याचा मार्ग स्वीकारला. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर प्रशासनाने मोहीम हाती घेताच रखडलेल्या प्रक्रियेला वेग आला. “कोंडी सोडवायची असेल तर कठोर निर्णय घ्यावेच लागतील,” अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या भूसंपादन विभागाचे उपअभियंता दिगंबर बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८४ मिळकतींचा ताबा आधीच घेण्यात आला असून उर्वरित २५ मिळकती ताब्यात घेण्यासाठी या आठवड्यात प्रक्रिया आणखी वेगाने राबवली जाणार आहे. अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी आणि वाहनचालक अक्षरशः त्रस्त झाले होते. आता रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळाल्याने कात्रज-कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. मात्र पुणेकरांचा अनुभव सांगतो — घोषणा आणि भूमिपूजन यापेक्षा काम पूर्ण होणे महत्त्वाचे! त्यामुळे आता नागरिकांचे लक्ष केवळ एका प्रश्नावर खिळले आहे — “रस्ता खरोखर मोकळा होणार की पुन्हा फक्त आश्वासनांचेच खड्डे भरले जाणार?”
