![]()
एका बाजूला उष्णतेचे चटके, दुसरीकडे वादळी पावसाचा कहर; हवामानाचा विचित्र तांडव
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे २०२६ ।। महाराष्ट्रात सध्या निसर्गाने अक्षरशः दोन टोकांचे रूप धारण केले आहे. एका बाजूला विदर्भ तापलेल्या भट्टीसारखा धगधगत आहे, तर दुसऱ्या बाजूला कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यात हवामानाचा असा विचित्र खेळ सुरू झाला आहे की, नागरिकांना नेमकं उन्हापासून वाचायचं की पावसापासून, असा प्रश्न पडू लागला आहे. विदर्भात तापमानाने ४६ अंशांचा टप्पा ओलांडत जीवघेणी परिस्थिती निर्माण केली आहे, तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने एका बाजूला उष्णतेसाठी रेड अलर्ट तर दुसऱ्या बाजूला पावसासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. “आभाळ रडतंय आणि जमीन भाजतेय,” अशी अवस्था महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.
विदर्भातील यवतमाळमध्ये उष्माघातामुळे तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य आणखी वाढले आहे. मृतांपैकी एकाची ओळख आनंद राजू वाडवे अशी पटली असून उर्वरित दोघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूरमध्ये तब्बल ४६.२ अंश सेल्सिअस तर अमरावतीत ४५.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत असताना लोक अक्षरशः सावलीसाठी भटकताना दिसत आहेत. आरोग्य विभागाने उष्माघात कक्षांना सतर्कतेवर ठेवले असून नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. “सूर्य डोक्यावर नाही, तर थेट अंगावर पडतोय,” अशी प्रतिक्रिया विदर्भातील नागरिक देताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई, आरोग्य समस्या आणि विजेच्या वाढत्या मागणीचे संकटही गडद होऊ लागले आहे.
दुसरीकडे कोकण, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा आणि कोल्हापूरच्या डोंगराळ भागात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा आणि संगमेश्वर भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळत आहेत. वादळी वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडत असून अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. जालना जिल्ह्यात तर निसर्गाने अक्षरशः थैमान घातले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे कोसळली, सौर पॅनेल्स फुटले आणि विजा कोसळून जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून “हा पाऊस दिलासा नाही, संकट घेऊन आलाय,” अशी हतबल भावना बळीराजा व्यक्त करत आहे.
दरम्यान, हवामान तज्ज्ञांनी यंदाचा नैऋत्य मान्सून नेहमीपेक्षा लवकर महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. कैलाश डाखोरे यांनी २९ मेपासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाईघाईने खरीप पेरणी करू नये, जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत थांबावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रात सध्या निसर्गाचे दोन चेहरे एकाच वेळी दिसत आहेत — एक जाळणारा आणि दुसरा झोडपणारा! हवामानाच्या या अनिश्चित तांडवाने नागरिक, शेतकरी आणि प्रशासन तिघांचीही झोप उडवली आहे.
