Strait of Hormuz:होर्मुज खुला; जगाच्या श्वासाला दिलासा मिळाला !

Spread the love

Loading

इराण-अमेरिका तणावात मोठी माघार; तेल, व्यापार आणि भारतासाठी मोठा दिलासा

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ मे २०२६ ।। America-Iran War: जगाच्या अर्थव्यवस्थेची नाडी मानल्या जाणाऱ्या ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ या सामुद्रधुनीवर अखेर आशेचा किरण दिसू लागला आहे. इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद पडलेला हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आता पुन्हा खुला करण्यासाठी इराणने तयारी दर्शवली असून, जगभरातील व्यापारी बाजारपेठांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. “तेलाचा श्वास पुन्हा सुरू होणार,” अशी भावना आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात व्यक्त होत आहे. युद्धाच्या धगधगत्या पार्श्वभूमीवर जगभरातील तेलवाहतूक, शिपिंग आणि व्यापार व्यवस्था अक्षरशः हादरून गेली होती. पण आता इराणकडून पुढील ३० दिवसांत व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे संकेत मिळाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र हा दिलासा मर्यादित स्वरूपाचा असेल, कारण युद्धाचा तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही.

इराणच्या ‘तसनीम’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनीबाबत अमेरिका आणि इराण यांच्यात प्राथमिक स्तरावर कराराची रूपरेषा तयार होत आहे. या करारानुसार सुरुवातीला केवळ व्यापारी आणि कमर्शियल जहाजांना मार्ग खुला केला जाणार आहे. युद्धनौका किंवा लष्करी हालचालींवर मात्र अद्याप निर्बंध कायम राहू शकतात. पुढील ३० दिवसांत टप्प्याटप्प्याने जहाजांची संख्या वाढवून युद्धपूर्व स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. जागतिक व्यापारासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण जगातील मोठा तेलपुरवठा याच अरुंद समुद्री मार्गातून होतो. काही दिवसांच्या बंदोबस्तामुळे तेलाचे दर आकाशाला भिडले, विमा खर्च वाढला आणि शिपिंग कंपन्यांवर आर्थिक संकट ओढावले. आता हा मार्ग पुन्हा खुला होण्याची चिन्हे दिसू लागल्याने बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या घडामोडींना दुजोरा देत “मोठा शांतता करार जवळपास निश्चित झाला आहे,” असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका, इराण आणि त्या परिसरातील काही महत्त्वाच्या देशांमध्ये व्यापक कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या करारामध्ये स्ट्रेट ऑफ होर्मुज पूर्णपणे खुला करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या घडामोडींना अत्यंत ऐतिहासिक मानले जात आहे. कारण युद्धाच्या भीतीने जगभरातील अर्थव्यवस्था हादरली होती. शेअर बाजारातील चढउतार, तेल दरवाढ आणि व्यापारातील अनिश्चिततेमुळे अनेक देश चिंतेत होते. आता या नव्या करारामुळे जागतिक व्यापाराला पुन्हा गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

भारतासाठी तर ही बातमी सोन्याहून पिवळी मानली जात आहे. कारण भारत आपल्या गरजेपैकी तब्बल ८० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल परदेशातून आयात करतो आणि त्यातील मोठा हिस्सा याच होर्मुज मार्गातून देशात पोहोचतो. युद्ध सुरू झाल्यानंतर व्यापारी जहाजांनी हा मार्ग टाळण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे भारताला लांबच्या समुद्री मार्गाने तेल आणावे लागत होते. परिणामी वाहतूक खर्च, विमा खर्च आणि इंधन दर वाढू लागले होते. सामान्य नागरिकांच्या खिशावर त्याची झळ बसण्याची भीती निर्माण झाली होती. आता होर्मुज पुन्हा खुला झाल्यास तेलपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल आणि वाढत्या महागाईलाही काही प्रमाणात आळा बसू शकतो. जगाच्या नकाशावरचा हा अरुंद समुद्री पट्टा पुन्हा एकदा जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *