![]()
ढगांची आश्वासने मोठी; पण सरींचा पत्ताच नाही, उकाड्याने पुणेकरांची चांगलीच कोंडी
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जुलै २०२६ ।। जुलैचा मध्य आला, पण पुण्याच्या आभाळाने अजूनही शब्द पाळलेला नाही. काही दिवसांपूर्वी रस्ते तुडुंब भरवणारा पाऊस आता जणू रजेवर गेलाय. ढग रोज येतात, आकाशात फेरफटका मारतात, पुणेकरांना दोन क्षणांची आशा दाखवतात आणि नंतर हात हलवत निघून जातात. परिणामी शहरात उकाड्याने अक्षरशः हैदोस घातला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितल्याने “येतो… येतो…” म्हणणाऱ्या पावसाने अखेर पुणेकरांचीच फिरकी घेतल्याचे चित्र दिसत आहे. मान्सूनच्या नावावर नुसती जाहिरात आणि प्रत्यक्षात मात्र कोरडाच कारभार, अशी अवस्था झाली आहे.
पावसाचा हा लपंडाव केवळ हवामानाचा विषय राहिलेला नाही; तो आता नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा बनला आहे. सकाळी ऊन, दुपारी उकाडा, संध्याकाळी ढग आणि रात्री पुन्हा निराशा… हा रोजचा कार्यक्रम झाला आहे. हवामान खाते कमी दाबाचा पट्टा, चक्रीय वारे, बंगालचा उपसागर अशा संज्ञा सांगत आहे; पण सामान्य माणसाला एवढेच कळते की, नळाला पाणी कमी, शेतात ओल नाही आणि अंगावर घामाच्या धारा. आकाशात ढगांची सभा भरते, पण पावसाचा ठराव मात्र मंजूर होत नाही. निसर्गही कधी कधी इतका राजकारणी होतो, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.
शहरातील तापमान ३१ ते ३२ अंशांवर पोहोचले असून आर्द्रतेमुळे उकाडा आणखी असह्य झाला आहे. जुलैमध्ये एप्रिलची आठवण करून देणारे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी चिंतेत आहेत, तर शहरातील नागरिक विजेचा वाढलेला वापर, पाण्याची वाढती गरज आणि दमट हवेमुळे त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीची चर्चा करणारेच आता पावसाचा एक थेंब पडावा म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. निसर्गाच्या या बदलत्या स्वभावाने हवामानाचा अंदाज बांधणाऱ्यांनाही गोंधळात टाकले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुणेकरांनी छत्रीपेक्षा पाण्याची बाटली जवळ ठेवण्याची वेळ आली आहे. पावसाने अशीच दडी मारली, तर पिण्याच्या पाण्यापासून शेतीपर्यंत अनेक प्रश्न उभे राहू शकतात. ढगांच्या केवळ दर्शनाने तहान भागत नसते, त्यासाठी पाऊस कोसळावाच लागतो. आभाळाने आता आश्वासनांची उधळण न करता प्रत्यक्ष सरींची उधळण करावी, एवढीच पुणेकरांची रास्त अपेक्षा आहे. कारण प्रतीक्षेलाही मर्यादा असते; आणि पावसाची ही अंतहीन वाट पाहताना आता नागरिकांचा संयमही आटत चालला आहे.