Sonam Wangchuk : सरकारशी चर्चा निष्फळ; वांगचूक ठामच राहिले

Spread the love

Loading

खासदारांशी थेट संवादाशिवाय उपोषण संपणार नाही; रुग्णालयातूनच संघर्ष सुरू

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुलै २०२६ ।। नीट-यूजी (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सुरू असलेल्या आंदोलनात नवा टप्पा आला आहे. केंद्र सरकारसोबत चर्चा होऊनही ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी आपले आमरण उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आंदोलक विद्यार्थी नेत्यांना संसदेत जाऊन खासदारांची भेट घेण्याची परवानगी द्यावी किंवा खासदारांनी स्वतः दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात येऊन चर्चा करावी, ही मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. सध्या त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी समाजमाध्यमांवर त्यांचे हस्तलिखित पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात वांगचूक यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या उपरोधिक नावाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी एकजूट व्यक्त केली आहे. पेपरफुटी प्रकरणातील उत्तरदायित्व निश्चित करावे आणि शैक्षणिक व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवावी, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

https://x.com/Wangchuk66/status/2079190689976647716?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2079190689976647716%7Ctwgr%5E75bd6bc7f0b5f61ae41109bfeb6849febdb4c6ab%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fnational%2Fsonam-wangchuk-hunger-strike-continues-after-government-talks-with-protesters-rg84

दरम्यान, वांगचूक यांच्या उपोषणाचा आज २३ वा दिवस असून त्यांनी रुग्णालयातूनच आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ‘एक्स’वर प्रसिद्ध केलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत विद्यार्थी नेत्यांना संसद भवनात जाऊन लोकप्रतिनिधींना भेटण्याची परवानगी मिळत नाही किंवा मला रुग्णालयातच खासदारांना भेटण्याची संधी मिळत नाही, तोपर्यंत माझे उपोषण थांबणार नाही.” विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

यापूर्वी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली होती. नड्डा यांनी समाजमाध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी सरकारसमोर लेखी निवेदन सादर केले असून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र, चर्चेनंतर कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील तणाव कायम असून, सोनम वांगचूक यांनी उपोषण अधिक तीव्र करण्याचे संकेत दिल्याने या आंदोलनाकडे आता देशभराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *