![]()
२४ ऑगस्टपासून केंद्र सरकारचा नवा नियम लागू; जिओ, एअरटेलसह सर्व कंपन्यांना कडक आदेश
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २२ ऑगस्ट २०२६ ।। आजच्या काळात मोबाईल नंबर बदलणं म्हणजे कपडे बदलण्याइतकं सोपं झालं आहे. एखाद्याच्या नावावर दोन, चार, सहा नव्हे तर दहा-दहा सिम कार्ड असण्याच्या घटना आता नवीन राहिलेल्या नाहीत. पण आता ही सवय महागात पडू शकते. २४ ऑगस्ट २०२६ पासून एका व्यक्तीच्या नावावर सरकारने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन असतील, तर त्याला नवीन सिम कार्ड मिळणार नाही. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) यासंदर्भात सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्पष्ट आदेश जारी केले आहेत. या निर्णयाचा उद्देश फसवणूक, सायबर गुन्हे आणि बनावट कागदपत्रांवर घेतल्या जाणाऱ्या सिम कार्डांना आळा घालणे हा आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ९ मोबाईल कनेक्शन असू शकतात. हा नियम नवीन नसून अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र, आतापर्यंत त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नव्हती. आता मात्र नवीन सिम देण्यापूर्वी एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया, बीएसएनएलसह सर्व कंपन्यांना ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती कनेक्शन आहेत, याची तपासणी करावी लागणार आहे. जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये ही मर्यादा ६ सिम कार्डांची आहे. म्हणजे तुमच्या नावावर आधीच ९ सिम असतील, तर दहावे सिम घेण्यासाठी दुकानात गेल्यावर ‘सिम संपले’ नव्हे, तर ‘मर्यादा संपली’ असे उत्तर मिळू शकते.
यासाठी सरकार डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म (DIP) नावाची प्रणाली वापरणार आहे. ही यंत्रणा देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांची माहिती एकत्रितपणे तपासते. नवीन सिमसाठी अर्ज करताना ग्राहकाला आपल्या नावावर आधीपासून असलेले सर्व मोबाईल नंबर नमूद करावे लागतील. २३ ऑगस्टपासून या प्लॅटफॉर्मवर मर्यादा पूर्ण झालेल्या ग्राहकांची ओळख फोटोच्या माध्यमातूनही दिसणार आहे. म्हणजे एका कंपनीकडून सिम नाकारले, तर दुसऱ्या कंपनीकडे जाऊन नंबर घेण्याची जुनी युक्ती आता चालणार नाही. कारण माहिती एका क्लिकवर सर्व कंपन्यांना उपलब्ध होणार आहे.
या नियमात आणखी एक महत्त्वाची तरतूद आहे. चुकीने मर्यादेपेक्षा जास्त सिम सक्रिय झाले, तर ते कनेक्शन तात्पुरते निलंबितही केले जाऊ शकते. टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या संपूर्ण तांत्रिक यंत्रणा डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी आपल्या नावावर किती सिम कार्ड आहेत, हे एकदा तपासून घेणेच शहाणपणाचे ठरेल. कारण आजपर्यंत सिम कार्ड सहज मिळत होते; पण आता सरकारचा संदेश स्पष्ट आहे — ‘एकाच नावावर सिमचा ढीग नाही, नियमांच्या चौकटीतच मोबाईल कनेक्शन मिळेल!’
