शाळा सुरु होणार की नाही… विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा ; शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २० नोव्हेंबर – महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमधील नववी ते अकरावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.

शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी आँनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांनी दिली. दिल्लीत करोनाची लाट पुन्हा आली आहे. तेथे करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार केला जात आहे. अनेक पालकांचाही मुलांना करोना काळात शाळेत पाठवण्यास विरोध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *