महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ६ डिसेंबर – कोरोनावरील लस कधी येईल हे आज सांगणे शक्य नाही. पण केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे लसीकरणाचा क्रम ठरविला जाणार आहे. लस हे अमृत नाही. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत मीच माझा रक्षक या भूमिकेतून प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे अपेक्षित असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
कोरोना साथीने थैमान घातलेले असताना आपल्या जीवाची पर्वा न करता सलग आठ महिन्यांपासून अधिक काळ रुग्णसेवेत झोकून देणा-या महाराष्ट्रातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि संपादक-पत्रकारांचा सन्मान आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालेल्या पत्रकारांच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व यावेळी स्वीकारण्यात आले.
टोपे म्हणाले, कोरोना झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर गेले असून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण ६०० दिवसांपर्यंत गेले आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्याचे खरे श्रेय डॉक्टरी सेवा देणा-या कोरोना योद्ध्यांचे आहे. मानवतेचे रक्षण करण्याचे काम डॉक्टरांनी केली आहे. डॉक्टरांमध्येच देवाचे दर्शन झाले आहे. या देवदूतांचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केला हा उपक्रम स्तुत्य असून प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. कोरोना काळात अनेक हात पुढे आले. सेवा देण्याचे हे काम मानवतेच्या दृष्टीने झाले आहे.
कोरोनाकाळात काम करणा-या पत्रकारांना विमा कवच मिळालेच पाहिजे यासाठी मीही आग्रही असून पत्रकारांसाठी सरकार दरबारी मी कायम वकिली करीत राहीन, अशी ग्वाही टोपे यांनी दिली.