महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ डिसेंबर – : उत्तर भारत कडाक्याच्या थंडीने गारठला आहे. आठवड्यातील दुसऱ्या पश्चिम विक्षोभामुळे डोंगराळ भागांत बर्फवृष्टी झाली. यामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल व उत्तराखंडमध्ये गारठा वाढला. डोंगराळ भागात आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे तापमान ३ ते ४ अंशांपर्यंत आणखी घसरले आहे. तेथून येणाऱ्या गार वाऱ्यांनी पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान व पश्चिमी उत्तर प्रदेश या मैदानी राज्यांत गारठा वाढवला आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पंजाब व हरियाणात कमाल तापमान २० अंशांपर्यंत असते. मात्र, यंदा ते १५ ते १६ अंशांदरम्यान आहे. काही जागी ते सरासरीपेक्षा ७-८ अंशांनी कमी आहे. हवामान खात्याचे वैज्ञानिक डॉ. कुलदीप श्रीवास्तव म्हणाले, संपूर्ण उत्तर भारतात आगामी दिवसात किमान तापमान एकेरी आकड्यात राहू शकते. कमाल तापमानही १५-१६ अंशांदरम्यान राहील.
तज्ज्ञांचे मत : यंदा तापमानातील चढ-उतार जास्त राहण्याची शक्यता स्कायमेटचे वैज्ञानिक महेश पलावत म्हणाले, दरवेळी पश्चिम विक्षोभ आल्यामुळे डोंगराळ भागांत बर्फवृष्टी होते. विक्षोभ जास्त मजबूत असला तर उत्तरेकडील मैदानी भागांत पाऊस पडतो. आकाश निरभ्र होऊन पश्चिमोत्तर वारे वाहू लागल्यास मैदानी भागांत तापमान वेगाने घसरते. गतवर्षी हिवाळ्यात अनपेक्षित पश्चिम विक्षोभ आले होते. यंदा आधीपासूनच ला निनाची स्थिती आहे. यामुळे यंदा पश्चिम विक्षोभ जास्त येणार आहेत. म्हणजे फेब्रुवारीपर्यंत २-३ दिवसांच्या थंडीच्या ८-१० लाटा येतील. उदा. २-३ दिवस कडाक्याची थंडी पडली. मग तापमानात काहीशी वाढ झाली. मग पुन्हा दोन-तीन दिवस थंडगार वारे वाहू लागले व स्थिती सुधारली. थंडीच्या अशा लाटा गेल्या हिवाळ्यात कमी होत्या.
१७-१८ डिसेंबरनंतर दाट धुक्याची शक्यता
सध्या वाऱ्याचा वेग जास्त आहे. यामुळे २ दिवसांपर्यंत दाट धुक्याची शक्यता नाही. मात्र, १७ किंवा १८ डिसेंबरनंतर वाऱ्याचा वेग कमी होत जाणार आहे. यामुळे धुके दाट होत जाणार आहे. यामुळे दिवसाचे तापमान घसरू लागेल.
