महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ डिसेंबर – भारतात व्यावसायिक गुंतवणूक व प्रगतीच्या संधींबाबत फेसबुक सीईओ मार्क झुकेरबर्ग व रिलायन्स चेअरमन मुकेश अंबानी यांंच्यात चर्चा झाली. ‘फ्युएल फॉर इंडिया २०२०’ नावाच्या संमेलनात अंबानी म्हणाले की, भारत येत्या वीस वर्षांत जगातील टॉप- ३ अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. दरडोई उत्पन्न दुप्पट झालेले असेल. यादरम्यान जिओ व फेसबुक दोन्ही मिळून व्हॅल्यू अॅडेड क्रिएटर होतील.
> झुकेरबर्ग म्हणाले : ‘तुमच्या (अंबानी) वडिलांनी ही गोष्ट खूप आधीच मनात आणली होती, त्याची अंमलबजावणी आपण करू शकलो. आज लोकांना पोस्टकार्डपेक्षाही कमी खर्चात एकमेकांशी संवाद साधता येतो व मेसेजिंगद्वारे आम्ही हेच करण्याचा प्रयत्न केला आहे.’
> वडिलांनी धैर्य, विश्वास व निष्ठा शिकवली : अंबानी म्हणाले- ‘माझे वडील १००० रुपये घेऊन १९६० मध्ये मुंबईत आले. भविष्याच्या उद्योगात गुंतवणूक करण्याचा विचार करून रिलायन्स स्थापन केली. आम्ही तीन तत्त्वांवर काम करतो. १. आत्मविश्वास व धैर्य. २. यशानंतर नेहमीच काही तरी नवीन करणे. ३. संबंध जपणे म्हणजे एकमेकांवर विश्वास व निष्ठा.
> व्हर्च्युअल रिअॅलिटी : अंबानींनी सांगितले की, एक दिवस असाही येईल की, जेव्हा फेसबुक आपल्याला त्या ठिकाणी नेईल, ज्याचा तुम्ही (झुकेरबर्ग) व्हर्च्युअल रिअॅलिटीबाबत विचार केला आहे. म्हणजे मी मुंबईतील घरात सामना बघत असताना ऑस्ट्रेलियातील मैदानात असल्याचा अनुभव येईल. डिजिटल आर्किटेक्चर आणि लीडरशिपमुळे तो दिवस आता दूर नाही, अशी मला आशा आहे.
> कोरोनाने उघडली संधीची दारे : अंबानी म्हणाले की, आज डिजिटल क्रांतीवर व्यापक चर्चा होत आहे. देशात कोरोनाने अनेक संधी उपलब्ध केल्या आहेत. मोदींनी संकटातही संधी शोधल्या आहेत. आगामी काळात जिओ मार्ट खेड्यातील दुकानदारांना जोडेल, त्यामुळे लाखो नवे रोजगार निर्माण होतील.
> झुकेरबर्ग यांनी डिजिटल इंडिया मोहिमेचे कौतुक करत सांगितले- यातून विकासाच्या अनेक संधी आल्या आहेत.