महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ डिसेंबर – शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पीएम-किसान योजनेद्वारे दिला जाणारा तिसरा हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे. शेतक-यांच्या खात्यात तीन महिन्यांचे पैसे महिन्याच्या पहिल्या १० ते १५ दिवसांत वळते केले जातात. ही रक्कम एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये शेतक-यांच्या खात्यात टाकली जाते. मात्र, डिसेंबर अर्धा संपत आला तरीही अद्याप बहुतांश शेतक-यांच्या खात्यात पैसे गेलेले नाहीत.
केंद्र सरकारने यंदाचे पहिले दोन हप्ते १५ दिवसांच्या आत शेतक-यांच्या खात्यात वळते केले होते. यामुळे शेतक-यांना कोरोना संकटात शेतीसाठीचे साहित्य, बियाणे आदी खरेदी करण्यास मदत मिळाली होती. कृषि मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले की, ९ कोटी शेतक-यांच्या खात्यात या वेळचा ६००० रुपयांचा हप्ता टाकण्यासाठीची सर्व तयारी झाली आहे. मात्र, आम्हाला वरून आदेश यायचा आहे. त्याची आम्ही वाट पाहत आहोत. हा पैसा एकरकमी टाकायचा आहे की टप्प्याटप्प्याने याबाबत सूचना येणार आहे. एनबीटीने याची माहिती दिली आहे.
अधिका-याने सांगितले की, शेतकरी आंदोलनामुळे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी व्यस्त आहेत. पीएम-किसान योजनेचे पैसे देण्यास होणा-या विलंबाला हे देखील एक कारण असू शकते, असे म्हणाला. दरम्यान, गेल्या वर्षी देखील शेतक-यांना डिसेंबरमध्ये दिला जाणारा हप्ता जानेवारीत दिला गेला होता. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मोठ्या समारंभाचे आयोजन करत हा हप्ता वितरित केला होता.
पीएम किसान सन्मान निधी स्कीम अंतर्गत हे पेसे दिले जातात. राज्य सरकारे अर्ज करणा-या शेतक-यांचा महसूल रेकॉर्ड, आधार नंबर आणि बँक खात्याची माहिती तपासते. राज्य सरकारे हे व्हेरिफाय केल्यानंतर एफटीओ तयार होतो आणि केंद्र सरकार त्यात पैसे वळते करते.