महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २८ डिसेंबर – मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात कांगारुंवर १३१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. रहाणेने दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रातच आपलं शतक पूर्ण केलं. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सत्रात दोन्ही फलंदाजांनी सावध सुरुवात केली.
अष्टपैलू रविंद्र जाडेजा आपल्या अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर असताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्याला एक धाव घेताना नाकीनऊ आणले. नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत असताना संभ्रमामुळे अजिंक्य रहाणे धावबाद झाला. परंतू यानंतरही अजिंक्य रहाणेने निराश न होता जाडेजाला प्रोत्साहन देत माघारी परतण पसंत केलं.
अजिंक्य रहाणे माघारी परतल्यानंतर रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, मात्र यानंतर तो देखील फारकाळ तग धरु शकला नाही. मिचेल स्टार्कने जाडेजाला ५७ धावांवर कमिन्सकरवी झेलबाद केलं.यानंतर उरलेले भारतीय फलन्दाज झटपट बाद झाले व ३२६ धावा करत भारताने १३१ आघाडी घेतली.
कांगारुं ची दुसऱ्या डावात ही खराब सुरवात झाली सलामवीर बर्न्स अवघ्या ४ धाव करून उमेश चा शिकार झाला व नंतर लांबूशेन ला अश्विन ने माघारी धाडले कांगारू ची अवस्था २ बाद ४२ अशी झाली . स्मिथ आणि वेड आता खिंड लढवत आहेत.