महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – ‘टीआरपी घोटाळा प्रकरणात एआरजी आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात आणि या वाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात गंभीर व महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत’, अशी माहिती मुंबई पोलिसांतर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. मात्र, या कंपनीची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलांना वैयक्तिक अपरिहार्य कारणांमुळे बाजू मांडणे शक्य न झाल्याने तूर्तास अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याची ग्वाही १५ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याची तयारी पोलिसांतर्फे दर्शवण्यात आली. त्यामुळे तोपर्यंत ‘एआरजी’ला दिलासा कायम राहिला आहे.
‘पोलिसांनी आत्तापर्यंतच्या तपासाचा अहवाल १५ जानेवारी रोजी सादर करावा. केवळ तोपर्यंतच कठोर कारवाई न करण्याविषयीची पोलिसांची ग्वाही कायम राहील’, असे न्या. संभाजी शिंदे व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेतलेल्या सुनावणीअंती आपल्या आदेशात स्पष्ट केले.घोटाळ्याचा तपास केवळ आम्हाला लक्ष्य करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करत कंपनीने याचिका व त्यात अनेक अर्ज दाखल केले आहेत. त्यात पोलिसांनी दिलेल्या ग्वाहीमुळे तूर्त अर्णव गोस्वामी व ‘एआरजी’च्या कर्मचाऱ्यांना कठोर कारवाईपासून दिलासा मिळाला आहे.
