महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ८ जानेवारी -हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळनंतर आता महाराष्ट्र आणि बिहारमध्येही बर्ड फ्लूच्या धोक्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. ज्या राज्यांत बर्ड फ्लूचा संसर्ग झाला आहे किंवा जेथे त्याचा इशारा जारी करण्यात आला आहे, तेथे केंद्र सरकारची पथकेही चाचण्या करण्यासाठी दाखल झाली आहेत.
दुसरीकडे, बर्ड फ्लूचे वृत्त आल्यानंतर देशात चिकन-अंड्यांची मागणी दोन दिवसांत सुमारे ६०%ने घटली आहे. पोल्ट्री फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रमेश खत्री म्हणाले, मागणी कमी झाल्याचा परिणाम चिकन-अंड्यांच्या दरांवर झाला आहे.
महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव नाही : सरकार
महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला नसल्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘विविध जिल्ह्यांमधून घेतलेल्या पक्ष्यांच्या घशातील द्रव, विष्ठा आणि रक्तजल नमुन्यांच्या तपासणीत बर्ड फ्लू नसल्याचे आढळले आहे.’