महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ जानेवारी – कोरोनामुळे वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून येत्या 27 जानेवारीपासून 5 वी ते 8 वीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. तथापि मुंबईतील सर्व शाळा पुढील आदेश मिळेपर्यंत बंदच राहणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.
यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे तीन वर्ग सुरू करण्याची अनुमती दिल्याचे गायकवाड म्हणाल्या. माध्यमिक विभागाचे नववी ते 12 वीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून या वर्गांच्या परीक्षा फेबु्रवारी, मार्चऐवजी एप्रिल, मेमध्ये होणार आहेत. आता प्राथमिक विभागाचे पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग 27 जानेवारीपासून सुरू होत आहेत. मात्र त्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक अद्याप स्पष्ट नाही.
राज्य सरकारने प्राथमिक विभागाचे तीन वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळांवर 16 जानेवारीपर्यंत घातलेली बंदी वाढवण्यात आल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच पुढील आदेश मिळेपर्यंत मुंबईतील सर्व शाळा बंद राहतील, असे परिपत्रक पालिकेच्या शिक्षण विभागाने शुक्रवारी काढले.