महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ । नवीदिल्ली । भाज्यांचे भाव कमी झाल्याने देशात किरकोळ महागाईचा दर कमी झाला आहे. जानेवारीमध्ये हा दर ४.०६ टक्के नोंदला गेला. गेल्या महिन्यात तो ४.५९ टक्के होता. सप्टेंबर २०१९ नंतरच्या कालावधीतील हा सर्वात कमी दर आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाईचा दर यंदा दोन टक्क्यांची घट किंवा वाढ अशा अंदाजाने ४ टक्क्यांवर राहील, असा अंदाज वर्तवला आहे. आकडेवारीनुसार भाज्यांचे भाव वार्षिक तुलनेत १५.८४ टक्क्यांनी कमी झाले. याशिवाय इतर वस्तूंच्या महागाई दरातही ६.६० वरून ६.४९ टक्के घसरण झाली आहे. दरम्यान, पान, तंबाखू, गृह, इंधन, वीज, वस्त्र, पादत्राणे यांच्या किमतीमध्ये या काळात किंचित वाढ झाली आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्याचा विचार करता महागाईचा हा दर साडेसहा वर्षांतील उच्च पातळीवर गेला होता. २०२० मध्ये जानेवारीत तो ५.५९%, फेब्रुवारीत ६.५८, मार्चमध्ये ५.८४, एप्रिलमध्ये ७.२२, मेमध्ये ४.२६, जूनमध्ये ६.२३, जुलैमध्ये ६.७३, ऑगस्टमध्ये ६.६९, सप्टेंबरमध्ये ७.२७, ऑक्टोबरमध्ये ७.६१, नोव्हेंबरमध्ये ६.९३% होता. डिसेंबरमध्ये तो ४.५९% वर आला.
ग्रामीण-शहरी दोन्ही भागांत दर झाला कमी
किरकोळ महागाईच्या दराचा शहरी आणि ग्रामीण असा विचार करता दोन्ही भागांत तो कमी झाला आहे. शहरात हा दर ५.१९ वरून ५.०६ तर ग्रामीण भागांत डिसेंबर-२० पर्यंत ४.०७च्या तुलनेत कमी होऊन ३.२३ टक्के झाला.