महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२०। पुणे । राज्यात अवकाळी पावसाचा इशारा कायम असून 24 तासांत पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्यात येत्या 24 तासांत अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण-मध्य महाराष्ट्रावर निर्माण झालेली चक्रवाताची परिस्थिती आता ओसरत आहे. मात्र दुसरीकडे उत्तर केरळपासून दक्षिण गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे.राज्यात अवकाळीपावसाचा इशारा कायम राहिला आहे. (Unseasonable Rain in Maharashtra) दक्षिण मध्य महाराष्ट्रावरील चक्रवाताची परिस्थीती ओसरली मात्र उत्तर केरळपासून गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे येत्या 24 तासांत पुन्हा पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात येत आहे. मात्र तरीही काही अंशी गारवादेखील टिकून आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईकर पाऊस, गारवा आणि किंचित उकाडा अशा तिहेरी वातावरणाला सामोरे जात आहेत. मुंबईत पुढील 24 तास असंच वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. मुंबईचं कमाल तापमान 33 तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं आहे.
शुक्रवारी मुंबई, मुंबई-उपनगरे, पुणे, नाशिक, जालनासहीत मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. मुंबई उपनगरांमधील नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबवलीसहीत अंबरनाथमध्येही मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. पावसामुळे शहर भागात गारवा पसरला. मात्र ऑफिसमधून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे पावसामुळे हाल झाले. यामुळे ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालंय. विदर्भातही अवकाळी पाऊस सुरू आहे. बुलढाण्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी आहे.