महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.६ मार्च – मुंबई – कोरोनामुळे मागील वर्ष सर्वच क्षेत्रांसाठी कठीण गेलं. याचा थेट परिणाम राज्याच्या तिजोरीवर झाल्याचा निष्कर्ष राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात वर्तविण्यात आला आहे. देशाप्रमाणेच राज्याच्या आर्थिक विकास दरात 8 टक्क्यांनी घट झाली आहे. अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेल्या कृषी क्षेत्राची भरभराट सोडल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्राला मोठा फटका बसल्याचं अहवालातून समोर आलं आहे.
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार 8 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार असून त्याआधी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आज 2020-21 या आर्थिक वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडण्यात आला. या अहवालात 2020 हे वर्ष कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांसाठी कठीण गेलं. त्यातही लघु उद्योग आणि बाजारपेठेवर याचा विपरीत परिणाम झाला असून देशाच्या व राज्याच्या अर्थव्यस्थेला मोठा फटका बसल्याच निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.पूर्वानुमानानुसार देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत देखील उणे 8.0 टक्के वृद्धी अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रात 11.7 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर उद्योग क्षेत्रात 11.3 टक्के तर सेवा क्षेत्रात 9.0 टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात 1 लाख 56 हजार कोटी रुपयांची घट अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार 3 लाख 47 हजार कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती, मात्र एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांत प्रत्यक्ष महसुली जमा केवळ 1 लाख 76 हजार 450 कोटी म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजाच्या फक्त 50.8 टक्के एवढीच आहे.