महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – पुणे – गेल्या काही दिवसांमध्ये उकाडा वाढल्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना आता आणखी त्रासाला सामोरे जावे लागू शकते. कारण, येत्या काही दिवसांत राज्यातील उन्हाचा कडाका (Summer heat) आणखी वाढणार असल्याचे भाकीत पुणे वेधशाळेने वर्तविले आहे. (Temperature will increase in Maharashtra)
तर दुसरीकडे हवामान खात्याने विदर्भात मात्र जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या भाकीतानुसार 10 आणि 11 मार्चला विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर , गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असे वेधशाळेने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत जाऊन पोहोचला होता. तर मध्य महाराष्ट्रातही तापमानात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यातील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात यंदा सरासरीपेक्षा तापमान जास्त राहणार असल्याची शक्यता नागपूर हवामान विभागानं वर्तवली आहे.
गेल्या आठवड्यात मंगळवारी अकोला जिल्ह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील अनेक जिल्ह्यातील दिवसा तापमान हे सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत 4-6 डिग्री सेल्सिअसने अधिक असेल. तर काही ठिकाणी हे तापमान 40० सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकतो. अरबी समुद्रात वाहणाऱ्या कोरडे वाऱ्यांमुळे हवेतील आद्रेतेत वाढ झाली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मार्चचा दुसरा आठवडा हा पहिल्या आठवड्यापेक्षा उष्ण असणार आहे.