महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च ।मुंबई । युरोपातील काही देशांत अॅस्ट्राझेनेकाच्या लसीचे (कोविशील्ड) प्रतिकूल परिणाम दिसून येत असल्याच्या बातम्यांनंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. अशा परिणामांचा तपास करण्यासाठी स्थापित राष्ट्रीय समितीचे चेअरमन डॉ. नरेंद्र अरोरा यांनी सांगितले, आम्ही लसीकरणाच्या पहिल्या दिवसापासून प्रतिकूल परिणामांचा आढावा घेत आहोत. आतापर्यंत फक्त ०.०००२५ टक्के लोकांनाच लस घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. ही सरासरी जगात सर्वात कमी आहे. म्हणूनच कोविशील्डबाबतच्या शंका निराधार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यूएचओ) दोन दिवसांपूर्वी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, लसीकरणानंतर आढळणाऱ्या क्षुल्लक प्रतिकूल परिणामांच्याही नोंदी ठेवल्या जात आहेत. आतापर्यंत तरी गंभीर परिणाम दिसून आलेले नाहीत.