महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २६ – मुंबई – गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये मोठे बदल झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. वारंवार होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अशात आता पुन्हा कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. शिमग्या आधीच नवी मुंबई, मुंबई, कोकण तापायला सुरुवात झाली. खरंतर, यंदाही कोरोनाचं थैमान सुरू आहे. यातही उन्हाच्या झळांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. (maharashtra weather update heat wave in mumbai navi mumbai thane weather report)
पुढील 48 तास उष्णतेची लाट मुंबईसह संपूर्ण कोकण प्रांतात कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. शुक्रवारसह शनिवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईसह पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील तापमानात वाढ होणार आहे असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
गुरुवारी दुपारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा 39 अंश एवढा नोंदवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअस झाला आहे. पालघर इथे गुरुवार दुपारी कमाल तापमान 41 अंश नोंदवले गेले. यामुळे उन्हाचा पारा वाढून नागरिक त्रस्त झाले आहेत.