महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २५ मार्च – जिल्हाधिकारी, महापौर, महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लॉकडाऊनबाबत आज महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘पुण्यात सध्या लॉकडाऊन करण्यात येणार नाही,’ असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, नियमांची अंमलबजावणी कठोरपणे केली जाईल. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल,’ असा इशाराही त्यांनी दिला. (Ajit Pawar on Lockdown In Pune)
पुणे शहरात १ ते १४ एप्रिल या कालावधीत लॉकडाउन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या प्रस्तावावर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौन्सिल हॉल येथे आयोजित बैठकीत चर्चा झाली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लॉकडाउन करण्यास विरोध दर्शवला. लॉकडाउन केलेल्या शहरांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळं लॉकडाउन नको, असं मत त्यांनी मांडलं. तर, आता लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी १ एप्रिलला पुन्हा बैठक घेऊन आढावा घ्यावा, अशी सूचना जिल्ह्याधिकारी राजेश देशमुख यांनी केली.
चर्चेअंती अजित पवार यांनी सध्या लॉकडाऊन न घेण्याचा निर्णय जाहीर केला. ‘जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करा. ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी अॅम्बुलन्सची व्यवस्था करा. गरज भासल्यास मनुष्यबळ वाढवा. खासगी रुग्णालयांमध्ये ५० टक्के बेड्स राखीव करा. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करा,’ अशा सूचनाही अजित पवार यांनी यावेळी प्रशासनाला केल्या.
शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील
एमपीएससीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील
लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी केलीय. लवकरच ३१६ वरून ६०० केंद्र होतील.
उद्याने सकाळी सुरू राहतील. सायंकाळी बंद राहतील
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत कोणताही बदल नाही
होळी सार्वजनिक पद्धतीने साजरी करू नये
हाॅटेलबाबत कोणताही बदल नाही. ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. रुग्णांची संख्या आणखी वाढल्यास हाॅटेल बंद करावी लागतील
लोकप्रतिनिधींनी राजकीय कार्यक्रम घेऊ नये
संचारबंदीच्या वेळेत कोणताही बदल नाही. रात्री ११ ते सकाळी ६ ही वेळ कायम
विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत करता येणार. अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत