महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३१ मार्च ।गेल्या महिन्यापासून खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत असून खाद्यतेलातील दरवाढीमुळे सामान्यांना थेट झळ पोहोचत आहे. गेल्या काही महिन्यांचा विचार करता सर्व खाद्यतेलांच्या दरात प्रतिकिलो ४० ते ६० रुपये एवढी वाढ झाली असून खाद्यतेलाची मोठी आयात परदेशातून करण्यात येत आहे. तेलबियांच्या उत्पादनात घट, वाहतूक खर्च, आयातशुल्कातील वाढीमुळे दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
देशाची एकूण गरज विचारात घेऊन ६० ते ६५ टक्के खाद्यतेल परदेशातून आयात करावे लागते. खाद्यतेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्यानंतर खाद्यतेलांच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्यातच तेल आयात होणाऱ्या देशांतील वातावरणातील बदलांमुळे तेलबियांच्या उत्पादनात घट झाली. करोनामुळे परदेशात मजुरांचा तुटवडा निर्माण झाला. त्याचप्रमाणे तेलआयातीसाठी लागणाऱ्या वाहतूक खर्चात वाढ झाली. सागरी मार्गाने वाहतूक करणारे कंटेनर उपलब्ध न झाल्याने परदेशातून होणारी खाद्यतेलाची आयात कमी झाली तसेच दरात मोठी वाढ झाली, अशी माहिती पुणे मार्केटयार्डातील खाद्यतेलांचे व्यापारी कन्हैयालाल गुजराती यांनी दिली.
खाद्यतेलांच्या आयातीवर भारत अवलंबून आहे. पेट्रोलनंतर सर्वाधिक आयात खाद्यतेलांची केली जाते. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने दोन वेळा खाद्यतेलावरील आयातशुल्कात (इम्पोर्ट ड्युटी) वाढ केली. आयात शुल्कवाढीनंतर परदेशातील खाद्यतेल उत्पादकांनी दरात वाढ केली. जागतिक बाजारपेठेत चीननंतर भारत खाद्यतेलांचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे.
खाद्यतेलांचे दर (१५ किलो डबा)
खाद्यतेल प्रकार मार्च २०२१ मधील मार्च २०२० मधील
शेंगदाणा २५५० ते २६५० रुपये १६०० ते १७०० रुपये
रिफाईंड शेंगदाणा २४०० ते ३००० रुपये १८०० ते २३०० रुपये
सोयाबीन २००० ते २१०० रुपये १२०० ते १३०० रुपये
सरकी तेल २००० ते २१०० रुपये १२०० ते १३०० रुपये
सूर्यफूल २४०० ते २५०० रुपये १२०० ते १३०० रुपये