महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ४ एप्रिल । IPL 2021 चा 14 वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या 9 एप्रिलला आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाईल. मात्र आयपीएलच्या 14 व्या हंगामावर कोरोनाचा सावट आले आहे. या कारणामुळे खेळाडूंच्या आरोग्याची काळजी म्हणून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या सर्वांना कोरोना लस देण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केली जाणार आहे. याविषयी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. महिनाभराआधी खेळाडूंना कोरोना प्रतिंबधक लस देण्यावर चर्चा झाली होती. मात्र, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगूली यांनी असे काहीही नसल्याचे सांगून सध्यातरी तशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले होते. पण आता कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे बीसीसीआयला आपली भूमिका बदलावी लागण्याची शक्यता आहे.
येत्या 9 एप्रिलपासून आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र, यापूर्वीच विविध संघांच्या एकूण 3 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाइटरायडर्सचा खेळाडू नितीश राणा, दिल्ली कॅपिट्लसचा अक्षर पटेल आणि रॉयल चॅलेंजेर्स बंगळुरुचा देवदत्त पडिक्कल या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. याव्यतिरिक्त वानखेड़े स्टेडियमवरील ग्राउंड स्टाफ, चेन्नई सुपर किंग्जचा एक कर्मचारी आणि आयपीएल इव्हेंट मॅनेजमेंटशी निगडीत असलेल्या एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, सध्या 8 संघांपैकी एकूण 5 संघ मुंबईत आहेत. महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. त्यामुळे या खेळाडूंना नेमकं कोठे ठेवायचं यावरसुद्धा विचार केला जाण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत असणाऱ्या खेळाडूंना कोरोना प्रतिंबधक नियम कठोरपणे पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीय खेळाडूंची रोज कोरोना चाचणी करणे अनिर्वाय करु शकते. सध्या प्रत्येक तीन दिवसांनी खेळाडूंची कोरोना चाचणी केली जातेय.