महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । कोल्हापूर । दि. ६ एप्रिल । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे व इतर गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी देवस्थान समितीची तातडीची बैठक झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरासह देवस्थान समितीकडील 3042 मंदिरे 30 एप्रिलपर्यंत भाविकांना दर्शनासाठी सोमवारपासून बंद करण्यात आली. 26 एप्रिल रोजी होणारी श्री जोतिबाची चैत्र यात्रा आणि 27 एप्रिल रोजी होणारा श्री अंबाबाई देवीचा रथोत्सव सोहळाही रद्द करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सोमवारी घेतला.
देवस्थानची कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मंदिरे शासनाच्या पुढील आदेशापर्यंत दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार असून केवळ पारंपरिक व धार्मिक सोहळे, पूजा-आरती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होणार आहेत. केवळ देवस्थान समितीचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक, स्वच्छता कर्मचारी या काळात सक्रिय राहणार असून इतर कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याने भाविकांनी मंदिरांच्या दरवाजांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन जाधव यांनी केले.
दरम्यान, देवस्थानच्या सर्व कर्मचार्यांचे लसीकरण येत्या दोन दिवसांत करण्यात येणार आहे. तसेच जोतिबा यात्रा व रथोत्सवातील धार्मिक विधींबाबत जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.