राज्यात कठोर निर्बंध आवश्यक; शरद पवारांचं जनतेला ‘हे’ आवाहन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ८ एप्रिल ।राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतोय. करोनाची रोजची आकडेवारी ५० हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळं सरकारनं ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, व्यापरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात निर्बंधांना विरोध होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेसोबत संवाद साधला आहे. जनतेच्या जीवाच्या दृष्टीनं राज्य सरकार कठोर निर्णय घेत आहेत. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंताजनक बाब आहे. डॉक्टर, परिचारक, आरोग्य कर्मचारी अहोरात्र कष्ट घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवत आहेत. करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. केंद्र सरकारही या संबंधी आग्रही आहे. केंद्र सरकार राज्याला सहकार्य करण्यास तत्पर आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन जाधव यांच्याशी मी संपर्क साधला. त्यावेळी संपूर्णपणे महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचं केंद्रानं सांगितलं आहे,’ असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

‘या परिस्थितीला धैर्याने सामोरं गेलं पाहिजे. समाजातल्या सर्व घटकांना विनंती की आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीविताच्या दृष्टीने काही अपरिहार्य निर्णय राज्य सरकारला घ्यावेच लागतात. हे निर्णय राबवण्यासाठी आपल्या सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. सगळ्या राजकीय नेत्यांना, सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांना माझी आग्रहाची विनंती आहे की परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नात आपले सहकार्य असू द्या,’ असं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *