महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१४ एप्रिल ।महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत (Maharashtra Coronavirus) मोठी वाढ होत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. परिणामी अनेक रुग्णांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (MNS Raj Thackeray writes to PM Modi) यांना पत्र लिहीत राज्यातील स्थितीचा आढावा मांडला आणि काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.
‘देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असताना टाळेबंदीसारखे पर्याय अवलंबले जात आहेत. ते आता राज्याला परवडणारं नाही. मात्र राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने पर्याय तरी काय उरतो?’ असं म्हणत राज ठाकरे यांनी कोरोना लसी आणि इतर सुविधा यांबाबत पंतप्रधान मोदी यांच्याकडे 5 मागण्या केल्या.
1. महाराष्ट्र राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करण्याची परवानगी द्यावी
2. सिरमला महाराष्ट्रात स्वतंत्रपणे लस विकण्याची परवानगी द्यावी
3. राज्यातील इतर खासगी संस्थांना लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी
4. लसीचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी हॉपकिन्स आणि हिंदुस्थान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी
5. राज्याला प्राणवायू आणि रेमडेसिवीर यांचा आवश्यक पुरवठा करता यावा म्हणून मोकळीक द्यावी अशीही विनंती.