महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शुक्रवारी अक्षय्यतृतीयेचा सोने खरेदीचा (Gold) शुभमुहूर्त टळला गेला. त्यामुळे राज्यातील सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे समजते. सोन्या-चांदीची (Gold) दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने फक्त मुंबईतील सोने बाजाराचे जवळपास 800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. (Gold and silver traders incurring heavy losses due to lockdown)
सध्या लॉकडाऊनमुळे केवळ ऑनलाईन पद्धतीने किंवा गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोने खरेदी शक्य आहे. कोरोनामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोने आणि चांदीचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. औद्योगिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांदीचा दरही वाढत आहे.
गेल्यावर्षी सोन्याने प्रतितोळा 56 हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. त्यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रतितोळा 52 हजारांच्या आसपास होता. तर यंदाच्या तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा 49 हजार इतका होता.
भारतात दरवर्षी 850 टन सोन्याची आयात होते. त्यामुळेच या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून ही पावले उचलली जात आहेत. आगामी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या व्यवहारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.