महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ जून । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षा रद्द केल्यानंतर पालक आणि मुलांच्या मनामध्ये नवीन भ्रम तयार झालाय. तो संभ्रम आहे परीक्षा तर रद्द झाल्या पण निकालाचा फॉर्म्युला काय असणार?… मुलांना नेमकं कोणत्या आधारावर पास करणार?, त्यांना केवळ उत्तीर्ण झालेलं प्रमाणपत्र मिळणार की त्यांच्या मुल्यांकनासंदर्भात दुसरी कोणती पद्धत वापरणार?, अशा एक ना अनेक प्रश्नांनी विद्यार्थी पालकांच्या मनात आहे.. (CBSE Board 12th Exam Cancelled but What is result Formula)
इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन निकष सध्या तरी जाहीर केले जाणार नाहीत. या मुल्यांकन निकषाला अंतिम रुप देण्यात काही वेळ लागेल, म्हणून ते निकष नंतर प्रसिद्ध केले जातील, असं सीबीएसईने स्पष्ट केलंय. दहावीच्या धर्तीवर सीबीएसई बोर्ड 12 वीच्या मूल्यांकनाचे निकषदेखील ठरवेल, अशीही चर्चा आहे.
ज्याप्रमाणे सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल तयार करण्यासाठी वस्तुनिष्ठ निकष तयार केले आहेत. त्याच आधारावर बारावीसाठीचे निकषदेखील ठरवले जातील. दहावीसाठीही अशी व्यवस्था केली गेली आहे की, जर विद्यार्थी या प्रक्रियेनंतर दिलेल्या गुणांवर समाधानी नसेल तर त्याला कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा परीक्षेला बसण्याची, हजर राहण्याचीही संधी दिली जाईल.बारावीच्या विद्यार्थ्याचा निकाल जाहीर करण्यासाठी वस्तूनिष्ठ कार्यपद्धती जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांच हित लक्षात घेऊन सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्य याचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं मोदी म्हणाले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम होता तो या निर्णयामुळं दूर कऱण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी सक्ती केली जाणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.