महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जून । लोकांना फसवून व्हॉट्सॲप नवे गोपनीयता धोरण मंजूर करून घेत असल्याचा दावा केंद्र सरकारने दिल्ली हायकोर्टात केला आहे. याबाबत केंद्र सरकारने गुरुवारी शपथपत्र दाखल केले आहे.
केंद्र सरकारनुसार, व्हॉट्सॲप युजर्सना सतत नोटिफिकेशन पाठवत आहे. अपडेटसाठी स्मरण करून देत आहे. नवीन अपडेटनंतर त्यांच्या खासगी संदेशांच्या गुुप्ततेवर परिणाम होणार नाही. मात्र जर ज्यांनी अपडेट स्वीकारले तर त्यांना व्यावसायिक संदेशांच्या देवाण-घेवाणसाठी अतिरिक्त माहिती मिळेल, असे त्यांना सांगितले जात आहे.
लवकरच खासगी माहितीच्या सुरक्षेसंबंधी कायदा केला जाणार असल्याचे केंद्राने म्हटले आहे. तो लागू होण्याआधीच व्हॉट्सअॅपला युजर्सकडून नवे गोपनीयता धोरण मंजूर करून घ्यावयाचे आहे. म्हणजे तो कायदा लागू झाला तरी त्याचा फार परिणाम होणार नाही. भारताच्या स्पर्धा आयोगाच्या २४ मार्च २०२१ च्या आदेशाविरुद्ध हे कृत्य असेल.
केंद्र सरकारने न्यायालयात शपथपत्र दाखल केल्यानंतर काही वेळातच व्हॉट्सअॅपच्या वतीने निवेदन काढण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, लोकांच्या (युजर्स) गोपनीयतेला त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पुढेही राहील. कंपनीने सरकारलाही हे सांगितले आहे.