महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ जून । केंद्राने शिक्षण क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा दिला आहे. आता एकदाच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण केल्यास त्याचे प्रमाणपत्र तहहयात मान्य राहील. सध्या त्याची मुदत ७ वर्षांची होती. या कालावधीत नोकरी न मिळाल्यास पुन्हा टीईटी पास करावी लागत होती.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल “निशंक’ यांनी गुरुवारी सांगितले की, टीईटी प्रमाणपत्रांची वैधता तहहयात करण्यात आली आहे. हा निर्णय २०११ पासूनच लागू राहणार आहे. म्हणजे २०११ पासूनच टीईटी प्रमाणपत्रांची वैधता ७ वर्षांनी वाढवून तहहयात होईल.
ज्या उमेदवारांचा ७ वर्षांचा अवधी पूर्ण झाला आहे त्यांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सीटीईटीची वैधता वाढवून तहहयात करण्याची शिफारस केली होती.
शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी प्रमाणपत्र आवश्यक
शाळा शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी टीईटी प्रमाणपत्र आवश्यक आहे. एनसीटीईने ११ फेब्रुवारी, २०११ ला सांगितले हाेते की राज्यांनी टीईटी आयोजित करावी. प्रमाणपत्राची वैधता ७ वर्षे असेल. सीटीईटीचे (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) आयोजन सीबीएसई करते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. पहिल्या पेपरमधील यशस्वी उमेदवारांना पाचवीपर्यंत शिकवता येते.