महाराष्ट्र २४- मुंबई ; मनसेच्या अधिवेशनात ,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील घुसखोरांचा मुद्दा उचलला होता व त्या विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज हा मोर्चा निघाला. या मोर्चासाठी औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, पुणे, ठाण्यातील मनसैनिकांची मोर्चाला मोठी उपस्थिती होती. शिवरायांची राजमुद्रा असलेला मनसेचा नवा भगवा झेंडा हा मोर्चाचं मुख्य आकर्षण होता. त्याशिवाय, मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर खूश असलेले अनेक कार्यकर्ते भगवा वेष परिधान करून मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळं संपूर्ण वातावरण भगवामय झाले होते.
मोर्चा दुपारी १२ वाजता निघणार होता. मात्र, गर्दीचा ओघ वाढत असल्यानं मोर्चा दुपारी तीनच्या सुमारास मरिन लाइन्सवरील हिंदू जिमखाना येथून मोर्चा सुरू झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं.
राज यांनी यावेळी केंद्र सरकारनं केलेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला जाहीर पाठिंबा दिला. ‘देशातील घुसखोरांची हकालपट्टी झालीच पाहिजे. या कायद्याविरोधात देशात निघणाऱ्या मोर्चाला हे मोर्चानं दिलेलं उत्तर आहे. मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं दर्शन झालंय. आता मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलंय. यापुढं नाटकं कराल तर दगडाला दगडानं व तलवारीला तलवारीनं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.