महाराष्ट्र २४ ; मुंबई :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर एकीकडे कर्मचारी आनंद व्यक्त करत असतानाच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे. आठवडा 5 दिवसांचा तर कर्मचाऱ्यांना 7 दिवसांचा पगार का द्यायचा?’ असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.
‘सरकारी कर्मचारी 2 दिवस तरी काम करतात का, हे आधी बघितलं गेलं पाहिजे. आमदार, खासदार असो की कर्मचारी त्यांना त्यांच्या कामानुसार पगार दिला पाहिजे. आधीच 7 वेतन आयोग लागू करण्यात आलेला असताना आता कामाचे दिवसही कमी करण्यात आले आहेत. जो कर्मचारी खरंच चांगलं काम करतो, त्याला हवं तर 4 दिवसांचा आठवडा करा,’ असं म्हणत बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे ठाकरे सरकारचा निर्णय? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरदारांना यापुढे दर शनिवार-रविवार सुट्टी मिळणार आहे. केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्याला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.