महाराष्ट्र २४ ; पुणे – राज्यात बुधवारी सकाळपासूनच असलेल्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली. शुक्रवारपर्यंत (ता. १४) ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ कायम राहणार आहे, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभावामुळे राज्यासह पुण्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दुपारपर्यंत सूर्याची किरणे जमिनीवर पोचत नव्हती. त्याचा थेट परिणाम पुण्यातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सिअस कमी होऊन ३०.३ अंश सेल्सिअस नोंदला गेला. रात्रीच्या तापमानातही ५.८ अंश सेल्सिअसने वाढ झाली. किमान तापमान १७.२ सेल्सिअस नोंदले गेले. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये आकाश निरभ्र होणार असल्याने शहरात रात्री पुन्हा गारवा वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ हवामान आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ ते ८ अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने गारठा कमी झाला. राज्यात सर्वांत कमी तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील दोन दिवस संपूर्ण हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.