महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ जुलै । जूनच्या अखेरीस काढता पाय घेतलेल्या मॉन्सूनचा (mansoon) ‘कमबॅक’ येत्या ४८ तासांत होईल. दक्षिण आणि उत्तर कोकण (konkan) भागात ८ ते १० जुलैला मुसळधार (heavy rain) पाऊस कोसळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील रखडलेल्या भात लागवडीच्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तौक्ते चक्रीवादळानंतर (tauktae cyclone) मॉन्सूनचे आगमन दमदार झाले होते; मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनने काढता पाय घेतला. रखडलेला मॉन्सूनच्या प्रवासानंतर आता पुणे वेधशाळेने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
पावासाने विश्रांती घेतल्याने खरीप हंगामातील शेती लागवडीत मोठा व्यत्यय आला आहे. नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर भातशेतीची लागवड सुरू असली तरी पावसाचे पाणी हे भात शेतीसाठी आवश्यक आहे. अलिकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेती केली जाते; मात्र कोकणातील किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (sindhudurg district) भात शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यंदा मे महिन्यातच भात पेरणी उरकून जूनच्या पहिल्या पंधरवड्यात लावणीच्या कामालाही सुरुवात झाली.
लावणीची कामे अंतिम टप्प्यात आली असताना पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. याबाबत पुणे येथील वेधशाळेशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले, की मॉन्सूनसाठी लागणारे पोषक वातावरण पंधरा१५ दिवसांत तयार झाले नव्हते. त्यामुळे कोकण प्रदेशात मॉन्सूनचे सक्रिय वारे नसल्याने आणि अरबी समुद्रात तशी परिस्थिती नसल्याने पावसाला पोषक वातावरण नव्हते; मात्र ४८ तासांत दक्षिण आणि उत्तर कोकणामध्ये मुसळधार पाऊस होईल. त्यानंतर ८ ते १० जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्याता आहे. त्यानंतर पावसाचे सातत्य कायम राहील असाही अंदाज पुणे येथील वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.