पंढरपुरात आषाढी एकादशीला मानाच्याच पालख्यांना परवानगी, उच्च न्यायालयाचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । आषाढी एकादशीला मानाच्या दहा पालख्यांसह इतर पालख्यांनाही पंढरपूर येथे जाण्याची परवानगी मिळावी यासाठी दाखल केलेली जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली. त्यामुळे आषाढी एकादशीलापंढरपूर येथे मानाच्या दहा पालख्याच जातील यावर शिक्कामोर्तब झाले.

न्यायमूर्ती सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला. लोकनायक बापूजी अणे स्मारक समितीने याबाबत याचिका दाखल केली होती. यावर्षी येत्या २० जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.

या दिवशी दरवर्षी हजारो पालख्या पंढरपूरला जातात; परंतु कोरोना संक्रमणामुळे गेल्यावर्षीपासून पंढरपूर वारीवर निर्बंध लावले जात आहेत. यावर्षी राज्य सरकारने केवळ दहा मानाच्या पालख्यांना पंढरपूर येथे जाण्याची परवानगी दिली आहे. न्यायालयाने सरकारच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

कोरोना संक्रमण लक्षात घेता सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य आहे. त्यात काहीच अवैधतता नाही. तसेच, हा निर्णय घेताना विदर्भासोबत भेदभाव केल्याच्या आरोपातही काहीच तथ्य नाही. वर्तमान परिस्थितीत अशा धार्मिक सोहळ्याविषयी धोरण ठरवण्यासाठी सरकार हेच योग्य प्राधिकरण आहे. न्यायालय याविषयी आदेश देऊ शकत नाही, असे न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *