महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । तीन आठवड्यापासून रेंगाळलेला मान्सून शनिवारपासून पुन्हा देशभर सक्रिय होत आहे. ८० टक्के भाग मान्सूनने व्यापला असून तीन दिवसांत तो देशातील उर्वरित २० टक्के भाग व्यापेल. दरम्यान, रविवारी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांत अनेक राज्यांत पाऊस पडेल. एका आठवड्यात सरासरी पावसाची भरपाई होण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसाचा अलर्ट : ११ ते १३ जुलैदरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, हरियाणा, दिल्ली, पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये देशभर ४० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला. जुलैमध्ये मात्र हे प्रमाण या महिन्यातील सरासरीच्या ६ टक्क्यांहून कमी आहे.
इकडे मराठवाड्यात हलक्या सरी : शुक्रवारी औरंगाबाद, बीड, परभणी, जालना आदी ठिकाणी पाऊस झाला. बीड जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सुरू होता. जालना जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १३.९० मिमी पावसाची नोंद झाली. परभणी जिल्ह्यात मानवत, जिंतूर, सेलू येथे गुरुवारी पहाटे व शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव तालुक्यातील सोना नदीला पूर आला होता. सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यात पाऊस झाला.