महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । गेल्या तीन-चार दिवसात पावसाने राज्यातील विविध भागात दमदार हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस पडले असा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज, तर मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज आणि उद्या पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये रेड अलर्ट म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात पुढील तीन-चार दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे.
राज्यात 12 जुलैपर्यंत 360.1 मिमी पावसाची नोंद
महाराष्ट्रात 1 जूनपासून सर्वत्र सरासरी पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात काल म्हणजेच 12 जुलैपर्यंत 360.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. 40 दिवसांत मान्सूनने संपूर्ण भारताचा प्रवास केला. दिल्लीत तब्बल 19 वर्षांनंतर मान्सून उशिराने दाखल झाला असून याआधी 2002 साली मान्सून 19 जुलै रोजी दिल्लीत दाखल झाला होता.