महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । कोरोनाची लाट काही प्रमाणात ओसरल्यानंतर राज्यात दुकानांच्या वेळेत वाढ करण्यात आली. आता सर्वसामान्यांना प्रतीक्षा आहे ती लोकल प्रवासाला कधी परवानगी मिळणार याची. याबाबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी संकेत दिले आहेत. येत्या दोन दिवसांत राज्य सरकार लोकलबाबत निर्णय घेईल, असे सूतोवाच आदित्य ठाकरे यांना केले.
निर्बंध शिथिल करताना काही बाबतीत अधिक जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. अमेरिका, इंग्लंड या देशात लसीकरण बऱयाच प्रमाणात झाले आहे, तरीही तिथे रुग्ण वाढत आहेत. सरकार सर्वसामान्यांच्या जिवाची काळजी घेत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका असल्याने राज्य सरकारकडून हळूहळू नियम शिथिल केले जात आहेत. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या जिह्यात अद्यापही निर्बंध कायम आहेत. मुंबईमध्ये दुकानांच्या वेळा, खेळाची मैदाने, व्यायामशाळा यामध्ये निर्बंध शिथिल केल्यानंतर आता लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यासाठी बैठका सुरू आहेत. याबाबत मिठी नदीच्या पाहणी दौऱयावर असलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, रेल्वे प्रवासाबाबत दोन आठवडय़ांपासून चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना केवळ लोकल ट्रेनमध्येच नव्हे, इतर ठिकाणीही कशा प्रकारे सूट देता येईल का, यावरही चर्चा सुरू आहे.