महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । शाळा सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. येत्या 17 ऑगस्टपासून तब्बल दीड वर्षांनंतर राज्यात शाळेची घंटा वाजणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याविषयीची माहिती दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत होणाऱया बैठकीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
1 ऑगस्टला ‘ब्रेक द चेन’अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. आता शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.