महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । मागील जवळपास पंधरा दिवसांपासून राज्यात पाऊस (Rain in Maharashtra) गायब आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तर गेल्या महिन्याभरापासून चांगला पाऊस कोसळला नाही. त्यामळे पावसाअभावी खरीप हंगामातील पिके धोक्यात (Crops in danger) आली आहे. औरंगाबाद बीड, जालना, हिंगोली या भागात थोड्याफार प्रमाणात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे याठिकाणी पिकांची स्थिती अजून तरी चांगली आहे. तर राज्यात सततच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या चिंता वाढत आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या ढगफुटी सदृष्य पावसामुळे येथील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. येथील शेतकरी अजूनही निसर्गाच्या प्रकोपातून सावरला नाही. तोपर्यंत राज्यातील इतर भागातही शेतकऱ्यांवरचं संकट गडद होतं आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात अनेक ठिकाणी पावसाअभावी पिके धोक्यात आली आहे. पुढील किमान आणखी पाच दिवस राज्यात पूर्णपणे उघडीप राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढत आहे.
मागील पंधरवाड्यापासून राज्यात मान्सूननं हळूहळू उघडीप घेतली आहे. कोकण आणि घाट परिसरात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली होती. पण आता मागील तीन दिवसांपासून याठिकाणी देखील मान्सूननं पूर्णपणे उघडीप दिली आहे. पुढील आणखी काही दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून उत्तर भारतात पावसाच्या सरी कोसळत आहेत. पण सध्या वायव्य मध्य प्रदेशातील हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेश, ओडीसा या क्षेत्रात कोसळणाऱ्या पावसाला ब्रेक लागला आहे. सध्या राजस्थानच्या गंगानगरपासून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे आज उत्तर भारतासह ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढला आहे.